नागपूर- मुंबई,पुणे आणि नागपूर या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. सोयीस्कर व आरामदायी प्रवासासाठी देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर
-मुंबई यादरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करावी,असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.
विनायक गर्ग म्हणाले की, वंदे भारत एक्स्प्रेस सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाडी आहे.देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे.ही गाडी पाच ते सात तासांच्या प्रवासाकरिता आहे.त्यापेक्षा अधिक लांबच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस येत आहे. या गाडीच्या डब्यांची निर्मिती होत आहे. देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागाने ही त्यांच्या विभागात सुरू करण्याची मागणी केली आहे.आम्हीसुद्धा महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या शहरादरम्यान अशी गाडी चालवण्यासाठी आग्रही आहोत.नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्याता यावी,असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे.परंतु नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय सर्वस्वी रेल्वे बोर्डाचा असतो.
दरम्यान,नागपूर ते इटारसी, नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते बल्लारपूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिकेचे काम सुरू आहे. नागपूर ते सेवाग्राम आणि सेवाग्राम ते माजरी (बल्लारपूर) तिसरी मार्गिकेच काम डिसेंबर २०२५ पूर्ण करण्यात येणार आहे.नागपूर ते इटारसी तिसरी मार्गिका २०२६ पर्यंत पूर्ण होईल.त्यानंतर चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होईल, असेही गर्ग यांनी सांगितले.