दोडामार्गच्या सासोली गावात ‘तिलारी’च्या कालव्याला गळती

दोडामार्ग – तालुक्यातील सासोली येथे तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पोट कालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पोट कालव्याची दुरुस्ती करण्याची विनंती तिलारी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

सुमारे ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र व गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची बांधणी केली आहे.मात्र आता हे कालवे शेवटच्या घटका मोजत आहेत. या कालव्याच्या पोट कालव्यांचीही अवस्था खडतर झाली आहे. आता तर गोव्याकडे जाणार्‍या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोट कालव्याला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पोट कालव्याद्वारे सासोली, पाटये पुनर्वसन, गोवा आदी भागातील शेतकर्‍यांना पाणी पुरवठा होतो. सासोली येथे कालव्याला गळती लागल्याने ऐन उन्हाळ्यात आवश्यक पाणी शेतकर्‍यांना मिळेनासे झाले आहे.

याबाबत सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी या पोटकालव्याला लागलेली गळतीची दुरुस्ती तत्काळ करावी, अन्यथा त्याच कालव्याखाली उपोषणास बसू असा इशारा दिला आहे. सावंत यांनी असेही म्हटले की, सातत्याने फुटणारे कालवे, त्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान पाहता बिकट बनलेल्या या कालव्यांची नव्याने दुरुस्ती करावी, अन्यथा हे कालवे प्रत्येक दिवशी फुटत राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top