कल्याण- कल्याण व आजूबाजूच्या शहरात महिलांवर होणारे अत्याचार, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खोणी ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. बाहेरील गावातील मुस्लिम धर्मियांना गावातील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी येण्यास ग्रामस्थांनी बंदी घातली आहे.
काल शुक्रवारी बाहेरील गावातील मुस्लिम बांधव गावात आले असता त्यांना खोणी ग्रामस्थांनी पुन्हा माघारी धाडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बदलापूर येथील मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये देखील एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली आहे.यामुळे खबरदारी म्हणून खोणी गावातील ग्रामस्थांनी ही भूमिका घेतली आहे. दर शुक्रवारी येथे नमाज पठण करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने खोणी येथे येतात.मात्र, काल सकाळपासूनच मशिदीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. गावाबाहेरून आलेल्या मुस्लिम बांधवाना पुन्हा माघारी पाठवण्यात आले. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानपाडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त गावात तैनात केला होता.
ग्रामस्थ हनुमान ठोंबरे यांनी याबाबत सांगितले की, आमच्या गावात प्रत्येक शुक्रवारी कमीत कमी दीड हजार मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी येतात.आजूबाजूच्या शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना,लव्ह जिहादची प्रकरणे, लहान मुलींवर होणारे अत्याचार यामुळे गावांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.आम्ही त्यांना सांगितले की बाहेरून जे लोक येतात त्यांनी नमाजासाठी दुसरीकडे व्यवस्था करावी. स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा आमचा विरोध नाही. फक्त बाहेरच्या लोकांना गावात येण्यास बंदी घातली आहे. पोलीस प्रशासनाचे आम्हाला सहकार्य आहे. त्यांनीही यापुढे सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.