पुणे- शहरात खासगी व सरकारी आस्थापनामध्ये नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचे आढळून आले आहे. अशा नोकरदारांना आपले रिक्षा परमीट ३१ जानेवारीपर्यंत परत करावे लागणार आहे.कारण नोकरी करताना रिक्षा परवाना बाळगणार्या परमीटधारकांवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.तरीही शहरात काही जण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवत असल्याच्या तक्रारी येत आहेत.रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वेच्छेने परत करणे आवश्यक असते. अशा व्यक्तींनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना परत करावा. त्यानंतर आरटीओकडून कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा आरटीओने दिला आहे.