कल्याण, डोंबिवली,टिटवाळा,मांड्यात गुरुवारी पाणी नाही

कल्याण – कल्याण,डोंबिवली आणि टिटवाळा परिसरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांच्या देखभाल आणि प्रभागांमधील पाणी पुरवठा वितरण वाहिन्यांमधील गळती दुरुस्तीची कामे गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहेत.त्यामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि मांडा शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी १८ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका हद्दीतील विविध भागातील रस्ते कामे आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी जलवाहिनी फुटल्या आहेत.या जलवाहिन्यांमधून रस्त्यावर पाणी वाहत असते.या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागेल . त्याशिवाय कामगारांना हे काम करता येत नाही. गळक्या जलवाहिन्या दुरुस्तीची कामे या पाणी पुरवठा बंदच्या काळात केली जाणार आहेत,असे पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले. या १८ तासाच्या पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत कल्याण पूर्व-पश्चिम,डोंबिवली पूर्व- पश्चिम, मांडा, टिटवाळा, शहाड, आंबिवली, वडवली, अटाळी आणि कल्याण ग्रामीणमधील काही गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top