कोरेगाव भीमा आयोगाचे कामकाज आजपासून सुरु

पुणे

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे काम उद्या ८ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरु होणार आहे. चौकशी आयोगाचे काम १२ फेब्रवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या काळात आयोगाकडून विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुण्याच्या विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक अशा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आले. हे आयोग या प्रकरणा संबंधित मुंबई आणि पुण्यात विविध राजकीय नेत्यांची आणि अधिकारांची चौकशी करत आहेत. उद्यापासून पुण्यात आयोगाच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे कामकाज १२ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहिल. पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. हिंसाचार झाल्यानंतर आंबेडकर यांनी विविध आरोप केले होते. पोतदार या एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक आहेत, तर हिंसाचार झाला, तेव्हा कदम या हवेलीच्या उपविभागीय अधिकारी होत्या. त्यामुळे या तिघांची उलटतपासणी केली जाणार आहे. आंबेडकर यांची उलटतपासणी ८ आणि ९ फेब्रुवारी, पोतदार यांची ९ आणि १० फेब्रुवारी, तर १२ फेब्रुवारी रोजी कदम यांची उलटतपासणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top