सातारा – सातारा जिल्हा पोस्ट ऑफिसमधील कोट्यवधीचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. याबाबत अनेक तक्रारीही झाल्या होत्या. या तक्रारींची दखल राष्ट्रीय तपास यंत्रणांनी घेतली असून काल साताऱ्यात १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापासत्रामुळे सातारा पोस्टातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित छापासत्रात अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसल्याचे जिल्हा पोलिसांनी म्हटले आहे.
कल्याणी गांधारी यांचे गुरुवार पेठ, शेटे चौक येथील निवासस्थान सीबीआयच्या धाडसत्रातील केंद्रस्थानी होते. काल चार पुरुष व एक महिला अशा पाच अधिकाऱ्यांनी कल्याणी गांधारीच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता कल्याणीसह तिच्या बहिणींनी त्यांना प्रतिकार केला. मात्र तो प्रतिकार धुडकावत अधिकाऱ्यांनी सुमारे ९ तास कल्याणीच्या घरातील प्रत्येक कागदपत्राची तपासणी सुरू केली. तपासणी करून बाहेर पडतानाही अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या छापासत्रात सीबीआयच्या हाती नेमके काय लागले, काही रक्कम हाती लागली का, यासारख्या बाबी लगेच स्पष्ट होऊ शकल्या नाहीत. मात्र तपास पूर्ण होताच माहिती उघड केली जाईल, असे म्हटले जात आहे. याकडे सातारकरांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.