रत्नागिरी- भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतीचा वापर केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानंतर आता नारायण राणे यांनी या याचिकेविरुद्ध हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.मात्र आता नारायण राणे यांनी वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जात विनायक राऊत यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.विनायक राऊत यांच्या याचिकेत दोष असल्याचा आरोप करत पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींच्या नावांच्या संदर्भात कोणत्याही तपशीलांचा उल्लेख नसल्याचे म्हटले आहे.निवडणूक याचिकेत आरोपांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असते. या कृत्यामध्ये असलेल्या पक्षाचे नाव आणि अशी घटना केव्हा घडली याची तारीख आणि ठिकाण यासह संपूर्ण माहिती द्यावी लागते,असेही नारायण राणे यांच्या याचिकेत म्हटले आहे.तर विनायक राऊत यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत नारायण राणे यांनी फसवणुकीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे.