लखनौ – केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरमधील भाजपाचे उमेदवार संजीव बल्यान काल प्रचारासाठी खतौली विधानसभा मतदारसंघातील करीमपूर गावात गेले होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या घटनेत या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असून वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.”संजीव बल्यान यांची काल करीमपूर गावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही तरुणांनी अन्य उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे या सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी सभेसाठी उपस्थित असणाऱ्या काही तरुणांनी बल्यान यांच्या वाहनांच्या दिशेने धाव घेत त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा सभास्थळी दाखल झाला. त्यांनी मंत्री संजीव बालियान यांना सुखरूप सभास्थळावरून बाहेर नेण्यात आले. या घटनेत १० जण जखमी झाले असून ताफ्यातील वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात सध्या पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्याबाबत बल्यान यांनी सांगितले की, ‘हा हल्ला सुनियोजित पद्धतीने करण्यात आला आहे. पराभूत आणि हताश विरोधकांचे हे षडयंत्र आहे, असे मला वाटते. आम्हाला यामध्ये कोणतीही कारवाई करायची नाही. आम्ही हे प्रकरण जनतेच्या दरबारी घेऊन जाणार, तेच याला न्याय देतील.’
या प्रकरणाबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधीर सैनी म्हणाले की, संजीव बल्यान यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक हताश आणि निराश झाले आहेत. म्हणूनच ते अशा क्षुल्लक गोष्टी करत आहेत.