नवी दिल्ली- नीट परिक्षा गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ७ याचिकांची सुनावणी आज झाली. यातील एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोटा येथील आत्महत्यांचा मुद्दा गैरवाजवी असून कारण नसताना असे भावनिक मुद्दे या प्रकरणात आणू नका असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने नीट परिक्षेच्या मार्गदर्शनावर बंदी आणायला नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला २ आठवड्यात आपली बाजू मांडायला सांगितले आहे तर केंद्र सरकारला पुढील सुनावणी पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.
नीट परिक्षेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेल्या ७ रिट याचिकांची सुनावणी आज न्या.विक्रम नाथ व न्या. संदीप मेहता यांच्या संयुक्त पीठासमोर झाली. यावेळी एका याचिकाकर्त्यांने कोटा येथील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, या आत्महत्यांचा व नीट परिक्षांच्या निकालांचा काहीही संबंध नाही. नीट परिक्षेतील गैरव्यवहारांच्या सीबीआय चौकशीची मागणी एका याचिकेत करण्यात आली होती. त्यावर राष्ट्रीय चाचणी संस्था व केंद्र सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय आदेश देता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राष्ट्रीय चाचणी संस्थेला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. या याचिकांमध्ये पेपर फुटीचाही मुद्दा मांडण्यात आला असून ओडीशा, कर्नाटक व झारखंड सारख्या राज्यातील विद्यार्थ्यांनी गुजरातच्या गोध्रा शहराची परिक्षाकेंद्र म्हणून केलेली निवड संशयास्पद असल्याने त्याच्या चौकशीची मागणी करणारी याचिकाही आहे.