नंदुरबार-निती आयोगाकडून देशभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे.या सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक असल्याचे समोर आले आहे.त्यापाठोपाठ नंदुरबारजवळच असलेल्या धुळे जिल्हासुद्धा दारिद्र्यरेषेखालील असल्याचे निदर्शनास आले आहे.
नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे.आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचीदेखील ओळख आहे.स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी आणि गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करत असतात.यातच दारिद्र्यरेषेखालील असलेल्या आदिवासी बांधवांची संख्यादेखील लक्षणीय असून आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या या ठिकाणी मोठ्या समस्या असून येथील आदिवासी बांधवांच्या विकास हा खुंटलेला आहे.
नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.या नीती आयोगाच्या सर्वेक्षण अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात ३३.१७ टक्के नागरिक हे गरिबीचे जीवन जगत आहे.तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात लागून असलेल्या धुळे जिल्ह्याचा दारिद्र निर्देशांकात दुसरा क्रमांक आला असून धुळे जिल्ह्यातील २१.४४ टक्के नागरिक हे दारिद्र्यरेषेखालील असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.