नवी दिल्ली- दिल्लीतील नरेला परिसरात असलेल्या एका फूड फॅक्टरीला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२) अशी मृतांची नावे आहेत. आग मोठी असल्याने संपूर्ण कारखाना आगीत जळून खाक झाला.
आज पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास फॅक्टरीत मूग डाळ भाजण्याचे काम सुरु असताना पाइपलाइनमधील गॅस गळतीमुळे बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने काही कामगारांना बाहेर पडता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत कामगारांना बाहेर काढले व त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. इतर ६ कामगार गंभीररित्या भाजल्याने त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या अधिक तपास सुरु आहे.