सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकट कोलझर गावादरम्यान नदीवर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून या पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र या पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे पुलाच्या ऐवजी वापरला जाणारा पर्यायी रस्तादेखील चिखलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तळकट कोलझर पुलाचे काम उशिराने सुरू करण्यात आले. मूळ ठेकेदाराकडून हे काम दुसऱ्या ठेकेदाराने हाती घेतले. त्यानंतर आता पावसााला सुरुवात झाली. पुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. मात्र या पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारावा लागत आहे. ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री नाही. त्यामुळे कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पुलाची उंची व रुंदी वाढल्याचे दिसत नाही. आणखी बरेच दिवस या पुलावरून वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे बांदा, तळकट, उगाडे, कळणे कोनाळमार्गे बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी आमची मागणी आहे.