बंगळुरू- कन्नडिगांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहीजे. यासाठी राज्यात राहणार्या प्रत्येकाने कन्नड भाषेतच बोलले पाहीजे, इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, असे जाहीर फर्मानच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या पश्चिम द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नाददेवी भुवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबद्दल आपले विचार व्यक्त केले.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,“कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. कन्नड लोक उदार असल्यामुळेच आता इतर भाषा बोलून आपण कर्नाटकमध्ये राहू शकतो, असे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती तुम्हाला तमिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा केरळ या राज्यात दिसणार नाही. तिथे फक्त त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला जातो. त्यामुळे आपणही आपल्याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल”, अशी भावना सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.