कर्जत- तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार वाढला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ताज्या घटनेत आंबिवली जवळच्या हिर्याचीवाडी येथील शेतकरी बाळू ठोंबरे यांच्या वासराची शिकार या बिबट्याने केल्याचे उघड झाले आहे.
हिर्याचीवाडी येथील बाळू ठोंबरे यांची जनावरे नेहमीप्रमाणे चरायला सोडली होती. मात्र घरी परताना या जनावरांमध्ये असलेले वासरू कुठेच दिसले नाही.त्यामुळे ठोंबरे यांनी जंगलाकडे धाव घेतली आणि शोधाशोध सुरू केली. रात्र झाल्याने पुन्हा सकाळी जंगलात शोध घेतला. त्यावेळी ठोंबरे यांचे वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.त्या वासराच्या जबड्यावर हल्ला करून त्याचे रक्त पिऊन हिंस्र प्राणी पसार झाला होता. या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपाल विठ्ठल खांडेकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बिबट्यासारख्या वन्य प्राण्याने या वासरावर हल्ला केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.