नवी दिल्ली- भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकत दीड तासाचे भाषण केले. देशाला पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवून विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पुढील शंभर दिवस संपूर्ण जोशात काम करून भाजपाला अधिक ताकदीने पुन्हा सत्तेवर आणा, असा कानमंत्र त्यांनी दिला.
नरेंद्र मोदींनी म्हटले की, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे तर पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत. त्यासाठी भाजपाची सत्तेत पुन्हा जोरदार वापसी झाली पाहिजे. आपल्याला 370 पार करायलाच हवे. आपल्याला विकसित भारताची उडी मारायची आहे. यासाठी पुढील 100 दिवस जोशात काम करायचे आहे. प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना सांगा प्रधान सेवक मोदींनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे.
आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे, ते राजा झाले तेव्हा आनंद घेत बसले नाही, त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. तिसरी टर्म भोगण्यासाठी नाही. मीही शांत बसणार नाही. मी राष्ट्र संकल्प घेतला आहे. मी देशाच्या कोट्यवधी लोकांसाठी जगतो, लढतो आहे. त्यांचे स्वप्न हाच मोदींचा संकल्प आहे. अजून अनेक निर्णय घ्यायचे आहेत. जो
स्वतःचा रस्ता बनवतो तोच विजयी होतो. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत आणायचे आहे. 2029 मध्ये युवा ऑलिम्पिक, 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक, 2070 पर्यंत नेट झीरो लक्ष्य गाठायचे आहे. देशाला काँग्रेसपासून वाचवा. देश एकच म्हणतो आहे की, आएगा तो मोदी! आपल्याला देशाचे भाग्य बदलायचे आहे, त्यासाठी हीच वेळ आहे. प्रत्येक नवीन मतदारापर्यंत पोहोचायचे आहे. ‘अबकी बार, भाजपा सरकार, अबकी बार 400 पार’ हे मिशन पूर्ण करायचे आहे.
राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित असलेल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत मोदी यांनी सांगितले की, भाजपाचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत असतात. आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने काम करायचे आहे. 18 वर्षांचे झालेले देशातील नवे तरुण 18 व्या लोकसभेची निवड करतील. पुढील 100 दिवस प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज, प्रत्येकापर्यंत पोहोचायचे आहे. सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. देशसेवेसाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील आणि भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळतील.
मोदी यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील यशाबद्दल बोलताना ध्येयही सांगितले. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत भारताने सगळ्या क्षेत्रांत उंची गाठली आहे. देशवासीयांना मोठ्या संकल्पाशी जोडले आहे. हा विकसित भारताचा संकल्प आहे. आता देश छोटी स्वप्ने पाहत आणि छोटे संकल्प करत नाही. स्वप्ने आणि संकल्प दोघेही आता विराट आहेत. आता आपले स्वप्न आणि संकल्पही हा आहे की, आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. पुढील पाच वर्षांत पूर्वीपेक्षा कितीतरी पट वेगाने काम करायचे आहे. आपल्याला विकसित भारताकडे मोठी झेप घ्यायची आहे. या लक्ष्यप्राप्तीसाठी सगळ्यात पहिली अट म्हणजे सरकारमध्ये भाजपाची वापसी. विरोधी पक्षनेतेही एनडीए सरकार 400 पारचा नारा देत आहेत. एनडीएच्या 400 पारसाठी भाजपाला 370 चा मैलाचा दगड पार करावा लागेल. अनेकदा लोक मला म्हणतात की, मोदीजी, तुम्ही खूप काही केलेत, सगळे मोठे संकल्प पूर्ण केलेत आणि आता तुम्ही एवढी धावपळ का करत आहात? 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे हे छोटे यश नाही. आम्ही देशाला घोटाळे आणि दहशतवाद हल्ल्यांपासून मुक्त करण्याचे काम केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्याचे काम केले आहे. परंतु मी बहुत हो गया, असा विचार करणाऱ्यातला नाही. त्यांचा अनुभव जुन्या राजकारणाचा आहे. पण आम्ही राजनीती नव्हे, तर राष्ट्रनीती करतो. स्वतःच्या सुख-समृद्धीसाठी जगणारा मी नाही. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन निघालो आहे. करोडो गरिबांसाठी, मुलांसाठी, तरुणांसाठी, माता-भगिनींच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही सगळे सेवाभावाने दिवस-रात्र एक करतो आहोत. 10 वर्षांत आम्ही जे केले, तो एक टप्पा होता. त्याने ध्येयापर्यंत पोहोचण्याचा विश्वास आम्हाला दिला. आता देशासाठी, कोट्यवधी नागरिकांसाठी त्यांचे जीवनमान बदलण्यासाठी खूप निर्णय अजून बाकी आहेत.
आपल्या गॅरेंटीचा पुन्हा एकदा उल्लेख करत मोदी म्हणाले की, आज भाजपा युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांच्या शक्तीला विकसित भारत घडवण्याची शक्ती बनवत आहे. पूर्वीच्या लोकांना असे वाटायचे की, सरकार बदलते पण व्यवस्था बदलत नाही. आम्हाला खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची भावना आहे, आम्ही प्रत्येक व्यवस्थेला जुन्या विचारसरणीतून आणि जुन्या दृष्टिकोनातून बाहेर काढले आहे. ज्यांना कोणी विचारले नाही, आम्ही त्यांना केवळ विचारलेच नाही, तर पूजलेही नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या अनेक योजना आणल्या. 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक साहसी आणि दूरगामी निर्णय आम्ही घेतले. विरोधी पक्षाने फक्त खोटी आश्वासने दिली. आम्ही जो वायदा करतो आहोत, तो करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य नाही. आमचे वचन विकसित भारताचे आहे.
आपण भारताला विकसित करू शकत नाही हे या लोकांनी मान्य केले आहे. हे स्वप्न पाहणारे फक्त भाजप आणि एनडीए आघाडी आहे. 2047 पर्यंत भारत विकसित करण्यासाठी आम्ही काम करू. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही मोदींची गॅरंटी आहे.
भारताची अर्थव्यवस्था एक अब्ज डॉलरची होण्यासाठी 60 वर्षे लागली. 2014 मध्ये दोन ट्रिलियनचा आकडाही खूप मोठा होता. 10 वर्षांत आम्ही अर्थव्यवस्थेत 2 ट्रिलियनची भर घातली. एका ट्रिलियनसाठी 60 वर्षे आणि 10 वर्षांत आणखी दोन ट्रिलियन वाढले. त्यांची अर्थव्यवस्थेला 11 वरून 10 क्रमांकावर नेताना दमछाक झाली. आम्ही ती पाचव्या क्रमांकावर आणली. आज इन्फ्रा बजेट 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
गरिबांसाठी करोडो घरे बांधली जात आहेत. वीज पोहोचत आहे, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, गावापर्यंत रस्ते बांधले जात आहेत. जेव्हा आपण टॉप 3 मध्ये पोहोचू तेव्हा आपल्याजवळ विकासासाठी किती भांडवल असेल याची कल्पना करा. भारत टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये आल्यास म्हणजे प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढेल, जीवनमान सुधारेल, सार्वजनिक वाहतूक आधुनिक होईल आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. प्रत्येक कुटुंबाचा जीवनस्तर वाढेल. उत्पन्न वाढेल. सगळ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल.
आज तरुणांनी विकसित भारताची सूत्रे हाती घेतली आहेत. दीड वर्षांपासून आम्ही या सूचनांसाठी काम करत असून, त्यासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात केली आहे. आत्तापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी रोडमॅपवर चर्चा करून सूचना केल्या आहेत. नव्या कल्पना केल्यात. यातील अर्ध्याहून अधिक लोक असे आहेत ज्यांचे वय 35 पेक्षा कमी आहे. 2019 मध्ये भारतात होणाऱ्या युवा ऑलिम्पिकची आम्ही तयारी करत आहोत. 2036 मध्ये ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहोत. 2030 पर्यंत रेल्वे कार्बनमुक्त करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. दुसऱ्या देशावरील अवलंबित्व कमी करत आहोत. नव्या लोकांना संधी देत आहोत, नव्या व्यवस्थेचा भाग बनवत आहोत. म्हणूनच जगातील सगळे देश जाणून आहेत की, ‘आयेगा तो भाजपा’ही.
भाजपाचे थीम साँग प्रकाशित
भाजपाने आज आपल्या एक्स अकाऊंटवरून नवे थीम साँगही प्रकाशित केले. ‘एक बार फिर मोदी सरकार’ असे या थी साँगचे शीर्षक आहे. सहा मिनिटांचे हे गीत असून, यात जास्तीत जास्त काळ मोदींची झलक दाखवण्यात आला आहे. तसेच भाजपाच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजपाने 24 जानेवारीलाही एक गाणे लाँच केले होते.