‘अटल सेतू’ मार्गावर सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच

मुंबई- भारतातील सर्वांत लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतू महामार्गावर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक वाहतूक ही अवजड वाहनांचीच झाली आहे.सुमारे ७०० टक्क्यांपेक्षा अधिक जड वाहनांची वाहतूक वाढली असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

दक्षिण मुंबईतील रहिवासी असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता.जानेवारी महिन्यात उद्घाटन झालेल्या या अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनांची एकूण संख्या जानेवारीमध्ये ५.२० लाख इतकी होती.मात्र ऑगस्टमध्ये वाहनांची हीच संख्या ७.२५ लाखांवर गेली. केवळ एप्रिल आणि जुलै महिन्यात त्यात थोडी घट झाली होती.ट्रक आणि बस यासारख्या वाहनांचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.त्यामानाने खासगी छोट्या वाहनांची वाढ केवळ ३१ टक्के आहे,असे एमएमआरडीएने दिलेल्या माहितीमध्ये दिसत आहे.हा सागरी पूल ७० हजारांच्या दैनंदिन वाहनांच्या क्षमतेसाठी तयार करण्यात आला आहे.