नवी दिल्ली – देशात मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव आज संपला. २५ जून रोजी लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती. या लिलावात एअरटेल कंपनीने सर्वाधिक ६ हजार ८५७ कोटी रुपयांची बोली लावली.
लिलावात भारती एअरटेलने ९७ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम, ९०० मेगा हर्टझ, १८०० मेगा हर्टझ आणि २१०० मेगा हर्टझ फ्रिक्वेन्सी बँड ६ हजार ८५७ कोटी रुपयांना विकत घेतले.ही या लिलावातील सर्वाधिक बोली ठरली. तीन दिवस आणि ७ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या लिलावातून सरकारला सुमारे ११ हजार ३४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मोबाईल कंपन्यांना येत्या दहा दिवसांत लावलेल्या बोलीची रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे.
एकूण १०,५२२ मेगाहर्टझ स्पेक्ट्रमचा लिलाव पुकारण्यात आले होते. एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या देशातील तीन मोठ्या कंपन्या लिलावामध्ये सहभागी झाल्या. संचार भवनातील दूरसंचार विभागाच्या वॉर रूममधून ऑनलाईन पध्दतीने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली.