नांदगाव पेठ
नांदगाव पेठ येथे सुट्टीवर आलेल्या २४ वर्षीय जवानाचा अपघाती मृत्यू झाला. अविनाश अंबादास उईके असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. तो वरुड तालुक्यातील गणेशपुर येथील रहिवासी होता. अविनाश दोन दिवसांपुर्वीच सुट्टीवर आला होता. तो काल अमरावतीला त्याच्या लहान भावाला भेटण्यासाठी जात होता. यावेळी रहाटगाव टी पॉईंट नजीक हॉटेल गौरी इन जवळ आला असता त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला तर विशाल सुखराम तुमडाम (१९) हा तरूण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. अविनाशने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून आपले शिक्षण पूर्ण केले व सैन्यदलात भरती झाला. अविनाश ४ वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाला. सध्या ओडिसा येथे तो कार्यरत होता. ओडीसा येथील प्रशिक्षण आटोपून अविनाश दोन दिवसांपूर्वीच त्याच्या गावी परतला होता. अविनाशच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.