सांगली – आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित लक्षात घेऊन कृषी विभाग व कृषी पणन मंडळामार्फत द २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेंतर्गत ‘सांगलीत ‘आंबा महोत्सव’चे आयोजन केले आहे.
सांगलीतील कच्छी जैन भवन, सांगली येथे हा आंबा महोत्सव भरणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, तासगाव या तालुक्यांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लांजा,
पावस, गुहागर आणि संगमेश्वर या भागातील शेतकरी स्वतःच्या शेतातील आंबा घेऊन सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले की, विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजित केला आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन २४ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित राहणार आहेत.