पनवेल- पनवेल तालुक्यातील राजीप शाळा धामोळे या आदिवासी वाडीवरील शाळेतील शिक्षक वेळेत शाळेत हजर नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, पनवेल यांच्याकडे आदिवासी ठाकूर समाज संघटना पनवेल तालुका यांच्यातर्फे तक्रार करण्यात आली होती. या विषयाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन चारही शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे
धामोळे (खारघर) आदिवासी वाडीवरील शाळेत हे चार शिक्षक कार्यरत आहेत. शनिवारी शाळेची वेळ सकाळी साडेसातची असून त्यापैकी एक शिक्षिका साडेआठ वाजता हजर झाल्याचे आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे म्हणणे आहे. त्यानंतर शाळा साडेआठ वाजता उघडण्यात आली. उर्वरित शिक्षक शाळेवर हजरच नव्हते. असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या आदिवासी वाडीवर शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे. शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहतो आणि त्यांच्या वागण्यामुळे आदिवासी वाड्यांवरील दुर्गम भागातील शाळा बंद पडत आहेत, असा गंभीर आरोप गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शाळेतील शिक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल समाजाच्या वतीने निषेधही करण्यात आला आहे. आदिवासी संघटनेच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग यानी धामोळे शाळेतील चारही शिक्षकांवर कारवाई केली आहे.