वाशिम : वाशिम जिल्हयात सोमवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. रात्री मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. आधीच अनेक अडचणींमुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार, शिवनी, वनोजा, पेडगाव परिसरात सोमवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. सध्या शेतात गहू, हरभरा, संत्री फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर दगावले. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार,अंजनगाव सुर्जी, चांदुर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा,गहू, तूर ,कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलपूरमधील बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचे 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यात अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सडावण, दहीवद, नगाव, गळखांब, पातोंदा, सावखेडा या गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली.जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.