लातूर- लातूर शहर महापालिकेच्या अंतर्गत असलेली परिवहन सेवा मागीत आठ दिवसांपासून बंद आहे. परिवहन सेवा देणाऱ्या एजन्सीला मागील वर्षभरापासून बिल मिळालेले नाही.यामुळे हे थकीत बिल मिळावे या मागणीसाठी एजन्सीने हा निर्णय घेतला आहे. शहर बससेवा बंद असल्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
लातूर शहरात महापालिकेकडून सप्टेंबर २०२२ पासून शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. याकरिता खासगी एजन्सीशी करार करून शहर बस चालवली जात आहे. या शहर बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे.यामुळे दिवसभरात २१ बसच्या माध्यमातून दररोज दोनशे ते अडीचशे फेर्या शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर होतात. परंतु ही सेवा थांबल्याने प्रामुख्याने महिला व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
शहर बससेवा सुरू करताना महापालिकेने एजन्सीशी करार करत महिलांना सिटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली. याचे भाडे महापालिका संबंधित एजन्सीला देणार आहे.त्यानुसार जानेवारी २०२३ पासून महिलांना मोफत प्रवास देण्याची अंलबजावणी सुरू झाली. मात्र मागील १५ महिन्यांपासून महापालिकेने महिलांच्या प्रवासाचे बिल एजन्सीला अद्याप दिलेले नाही. ही रक्कम २ कोटींवर गेली आहे. याकरिता एजन्सीने महापालिकेला पत्रदेखील दिले आहे. तरीदेखील बिल अदा करण्यात आले नसल्याने मागील आठ दिवसांपासून एजन्सीने बससेवा थांबवली आहे.