नागपूर
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करूनही भाजपाने राणांना अमरावतीमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी राणांच्या विरुद्ध उमेदवार घोषित केला आहे. आता त्यांनी रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा जाहीर करून महायुतीशी अजिबात जुळवून न घेण्याचे संकेत दिले आहेत. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे आता महायुतीतील राजकारण तापले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे यांनी म्हटले की, महायुतीमध्ये बच्चू कडू यांना सन्मान दिला जात नाही. राणा दाम्पत्य बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करते. त्यांची निंदानालस्ती करते आणि भाजपा अशा व्यक्तीला उमेदवारी देते. हा प्रकार प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारा आहे. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून रद्द करण्यात आले आहे. हा मागासवर्गीय महिलेवर अन्याय आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा ठराव केला आहे. त्याला बच्चू कडू यांनी मान्यता दिली आहे.