रत्नागिरी – रत्नागिरी शहराला शीळ धरणातून जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे आता १५ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता अविनाश भोईर यांनी दिली आहे.
अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले की,सध्या शहरात पाणीटंचाईमुळे आठवड्यातून दोनवेळा कपात केली जात आहे. मात्र पाण्याची उपलब्धता लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणे १५ एप्रिलपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. लवकरच त्यासंदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातून सध्या पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या धरणातून पाणीपुरवठा पुन्हा सुरू व्हावा यासाठी योजना हाती घेतली आहे. तसेच शीळ धरणातील पाणी पातळीकडे नगगर परिषद प्रशासन लक्ष ठेवून आहे. दैनदिन जलपातळी आणि जूनपर्यंत करावा लागणारा पाणीपुरवठा याचा विचार करता एक दिवसाआड करून पाणीपुरवठा वेळापत्रक लागू करावे लागेल, असे प्रशासनाला वाटत आहे.पाणीसाठा पातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.१५ एप्रिलपासून पाणी पुरवठ्यासंदर्भातील वेळापत्रक ठेवण्याविषयी येत्या २-३ दिवसात नागरिक सूचना जारी करण्यात येईल.