*एकाच कंपनीची निविदा
मुंबई- मुंबई उपनगरातील झोपडपट्टीतील स्वच्छतेची जबाबदारी आता एकाच कंत्राटदारावर असणार आहे. पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार असून १२०० कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा प्रक्रियेला अखेरच्या दिवशी फक्त एकाच कंत्राटदार कंपनीने स्वारस्य दाखवले. त्यामुळे आता या निविदा प्रक्रियेला १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषत: झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या.पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. वास्तविक, पालिकेच्या या निर्णयामुळे ‘दत्तक वस्ती योजना’ बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे गोरगरीब यामुळे बेरोजगार होणार आहेत.