*पालिका प्रशासनाची
हायकोर्टात हमी
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरातल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी हमी पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात दिली आहे.तसे प्रतिज्ञापत्रच सादर करण्यात आले आहे. अॅड.रुजू ठक्कर यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.
या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना ऑगस्ट २०२३ मध्ये समन्स जारी केले होते. यावर न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्यासमोर सुनावणी झाली.त्यावेळी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त करत रस्त्यांचे काँक्रिटीकरण शीघ्रगतीने करत ते दोन वर्षांत पूर्ण केले जाईल अशी हमी दिली. पालिकेच्या रस्ते आणि वाहतुक विभागाचे मुख्य अभियंता एम. एम. पटेल यांनी तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पूर्व व पश्चिम उपनगरातील फक्त २० टक्के काम पूर्ण झाले असून सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करायला पुढील दोन वर्षे तरी लागतील असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.