मुंबई
मुंबईत सोमवारी २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी बेस्टच्या ६२९ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ व दिव्यांग, मतदान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सोयीसाठी ह्या बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तिंसाठी व्हीलचेअर बसेसची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधामुळे ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तिंंना मतदान केंद्रावर जाताना त्रास होणार नाही. यासोबतच २५० रिक्षा देखील लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत प्रवास करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी बस आणि रिक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित धावणाऱ्या बसची संख्या कमी होणार आहे. याचा परिणाम बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.