मालेगाव – गेल्या काही दिवसांपासुन शहर व परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.सोमवारी तर या हंगामातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.सध्या नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले आहेत. उकाड्यामुळे शेतकर्यांची
जनावरेही त्रस्त झाली आहेत.
शहरात सोमवारी कमाल ४२ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसापासून मालेगावच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सूर्याने आग ओकण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत असून उकाड्याने नागरिक हैरान झाले आहे.वाढत्या उन्हामुळे शहरात दुपारनंतर रस्त्यांवर वर्दळ मंदावत आहे.तसेच उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कुल्फी,लिंबू सरबत, शिकंजी,आईस्क्रीम,बर्फगोळे,रसवंतीगृहांवर मोठी गर्दी होवू लागली आहे.पुर्व भागात रमजान पर्व सुरु असल्याने दुपारी जणू काही शुकशुकाटच दिसत आहे. बहुसंख्य मुस्लीम बांधव प्रार्थनास्थळांमध्ये विसावा घेताना दिसत आहेत.वाढत्या तापमानामुळे पशूपक्षांसह पशुधनही उकाड्याने त्रस्त दिसून आले.दुभत्या म्हशींसाठी पाण्यात भिजवून अंगावर बारदान टाकण्याची व्यवस्था काही गोठेमालक व शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.