नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुर्ननिरक्षण मतदार याद्यांमधून १ कोटी ६६ लाख मतदारांची नावे काढून टाकली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. याबरोबरच २ कोटी ६८ लाख नव्या मतदारांची नावेही मतदार याद्यांमध्ये जोडली गेली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या ९७ कोटी पात्र उमेदवार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे. मतदार यादीमधील बनावट किंवा डुप्लिकेट नावे शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशाच्या यादीत सुधारणा करण्यात आल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली. या संदर्भात निवडणूक आयोगाने एक शपथपत्रही सादर केले आहे.