पुणे- दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथील लिफ्ट परिसरातील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडले आहे. यामुळे नदीवरील कृषिपंप बंद असल्याने शेतातील उभी पिके करपू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देऊळगाव राजे व वडगाव दरेकर शिवेजवळील लिफ्ट परिसरातील नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे शेतीपंप बंद पडले आहेत. त्याचप्रमाणे देऊळगाव राजे व खोरवडी येथील नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यानेही तळ गाठला आहे.अनेक शेतकऱ्याचे कृषिपंप पाण्याअभावी बंद पडत असल्याने शेतकरी नदीपात्रात खड्डे खोदत आहेत.सध्या उन्हाळा असल्याने पिकांना आठ दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. पाण्याअभावी शेतातील ऊस, मका, कांदा, भुईमूग, उडीद यासारखी पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी पाण्याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. भामा आसखेड धरणातून बंधारे भरण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तरी भामा आसखेड धरणातून सोडलेले हे पाणी या परिसरातील भीमा नदीपात्रात पोचण्यासाठी जलसंपदा विभागाने बंधाऱ्याची ढापे काढून उपाययोजना करण्याची मागणी दौंड व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.