नवी दिल्ली – केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने भारत-पे कंपनीला कंपनी कायदा कलम २०६ अन्वये नोटीस बजावली आहे.या नोटीसीद्वारे सरकारने कंपनीचे माजी संचालक अशनीर ग्रोव्हर यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईची माहिती मागितली आहे.
कंपनीचे संचालक ग्रोव्हर यांनी कोटक समूहाच्या कर्मचाऱ्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती.त्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर ग्रोव्हर यांनी भारत-पे कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कंपनीचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता.आॅडीट झाल्यानंतर व्यवस्थापनाने ग्रोव्हर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप ठेवला होता.व्यवस्थापनाने असा दावा केला होता की ग्रोव्हर पती-पत्नीमुळे कंपनीचे ८८.६७ कोटी रुपयांचे नुकसान झाले.ग्रोव्हर दाम्पत्याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आता कॉर्पोरेट मंत्रालयाने याची दखल घेतली असून कंपनी व्यवस्थापनाने ग्रोव्हर यांच्याविरोधात खटला दाखल करताना जे पुरावे न्यायालयात सादर केले होते त्याची माहिती मंत्रालयाने मागितली आहे.