नागपूर
नागपूर जिल्ह्यातील मौदा गावात काल भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून मौदा परिसरात भटके कुत्रे हैदोस घालत आहेत. या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले आहे. अनेकदा ते लहान मुलांवरदेखील हल्ला करतात. अशीच घटना काल गणेश नगर परिसरात घडली. यात ३ वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आई घरकामात व्यस्त असताना हा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. त्यावेळी दोन भटकी कुत्री बाहेर दबा धरून बसली होती. त्यांनी लहान मुलाला पाहताच त्याच्यावर हल्ला केला. यातील एका कुत्र्याने मुलाची मान तोंडात घट्ट पकडली होती. तर दुसऱ्याने त्याच्या खांद्याला पकडले होते. मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने शेजारी बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मौदा तालुक्यात गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.