मुंबई
पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या नव्या मार्गिकेसाठी भूसंपादन केले जाणार आहे. या कामामुळे वसईलगतची ५ गावे बाधित होणार आहेत. याबाबत रेल्वेने अधिसूचना जारी केल्यानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. यासंदर्भात काल पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई पूर्व येथे ‘रेल्वे परिषद’ बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला बाधित गावातील नागरिक देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान खासदार राजेंद्र गावित यांंनी नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वेच्या अधिसूचनेबाबत नागरिकांच्या मनात उपस्थित होणाऱ्या शंकांचे त्यांनी निरासन केले. त्यामुळे आता बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या नव्या मार्गिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवलीदरम्यान नव्याने ५ आणि ६ क्रमांची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रॅकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वशई पश्चिमेकडील उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत. यामध्ये जवळपास ७५ वर्षांपूर्वीचे चर्च, १०३ वर्षांपूर्वीचे देऊळ आणि जवळपास १०० वर्षांपूर्वीची घरे बाधित होणार आहेत. तसेच वसई स्थानक, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर येथील अनेक इमारतीही बाधित होणार असून त्याचा फटका येथील नागरिकांना बसणार आहे. याबाबत बैठक घेत खासदार राजेंद्र गावित यांनी नागरिकांच्या मनात उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरासन केले.