नागपूर
बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम (प्राणी गणना) हे समीकरण झाले आहे. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते. परंतु यंदा तो कार्यक्रम २२ मे रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी बुद्धपौर्णिमेदिवशी प्राणी गणना होणार नाही. बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त चुकल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कनिष्ठांकडे विचारणा करून त्यांची कानउघाडणी केली. या तारखेत २२ ऐवजी २३ मे असा बदल करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्याने २२ मे रोजीच निसर्ग अनुभव कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, उन्हाळ्यातच प्राणीगणना केली जाते कारण, या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी जिथे पाणी असते तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्धपौर्णिमेला उन्हाळ्यातील सर्वाधिक चंद्रप्रकाश असलेली रात्र असते. जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात. त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात. रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात