नवी दिल्ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने बनावट कॉल्सवर नियंत्रण ठेवले नाही, म्हणून दूरसंचार कंपन्यांना आतापर्यंत ११० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सध्या लोकांना अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत, त्यापैकी बहुतांश मार्केटिंग कॉल्स आहेत. हे थांबवण्यासाठी ट्रायने कठोर पावले उचलली आहेत.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने भारतातील नामांकित दूरसंचार कंपन्यांवर कारवाई केलीय. देशभरातील फोन वापरकर्ते बनावट कॉलमुळे हैराण झाले आहेत. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना अनेक वेळा असे कॉल्स थांबवण्याचा इशारा दिला होता, परंतु कंपन्या तसे करण्यात अपयशी ठरल्या आहेत. दूरसंचार नियामकाने आतापर्यंत या कंपन्यांना ११० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनोळखी नंबरवरून येणारे बनावट कॉल ही भारतातील एक मोठी समस्या आहे.ट्रायने वारंवार टेलिकॉम कंपन्यांना हे कॉल्स थांबवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले होते. काही विपणन कंपन्या टेलीमार्केटिंग क्रमांकांऐवजी सामान्य फोन नंबरद्वारे संपर्क साधतात. लोकांना वाटते की, हा एक ओळखीचा कॉल आहे, परंतु प्रत्यक्षात हे बनावट टेलीमार्केटिंग नंबर आहेत. टेलिकॉम ऑपरेटर अशा कॉल्सवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत.