इस्लामाबाद :
पाकिस्तानमध्ये गेल्या सहा दिवसांत अति उष्णतेमुळे एकूण ५६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. मात्र हवेतील ओलावा जास्त असल्याने आर्द्रता वाढत आहे. यामुळे ४० अंश तापमानही ४९ अंशांसारखे वाटते. गेल्या ४ दिवसांत उष्माघातामुळे २६७ लोकांना कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इधी फाऊंडेशन या पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख फैसल यांनी सांगितले की “ते कराचीमध्ये ४ शवागारे चालवत आहेत, परंतु आता मृतदेह ठेवण्यासाठी शवागारांमध्ये जागा उरलेली नाही. येथे दररोज ३० ते ३५ मृतदेह येत आहेत.” तर दुसरीकडे आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना कराचीच्या रस्त्यावर आतापर्यंत ३० लोकांचे मृतदेह सापडले. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये २४ जून रोजी पारा ४१ अंश सेल्सिअस होता. त्यामुळे प्रशासनाने लोकांना जास्त पाणी पिण्याचा आणि हलके कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.