त्र्यंबकेश्वर –
समुद्रसपाटीपासून ३ हजार फुट उंचीवर असलेल्या त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहिल्या धरणाचा पाणीसाठा संपुष्टात आला आहे. तसेच आंबोली व बेझे धरणाचा पाणीसाठाही खालावत चालला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने शहराला आज मंगळवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील विविध भागात सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा केला जात असून त्यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यंदा पाऊस सुरू होईपर्यंत हा एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.तसेच लोकांना चांगल्या दाबाने पाणी मिळावे यासाठी शहरांतर्गत झोन तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये,असे आवाहन नगरपरिषदेच्या प्रशासक डॉ. श्रीया देवचके यांनी केले आहे.शहरातील बहुतांश भागात सकाळी पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील अल्पबचत भवन परिसरात मात्र सायंकाळी ५.४५ ते ६.३० यावेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.