नाशिक
नाशिकच्या पंचवटी येथील तपोवनमधील मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करताच गोदावरी पात्रात सोडले. यामुळे गोदावरीतील जलसृष्टी व मासे यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच गोदीवरी काठी येणाऱ्या पर्यटकांना सांडपाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांंमध्ये देखील नाराजीचे सूर उमटत आहेत.
नाशिक महापालिकेने गोदावरी कृती आराखड्याअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ७८ एमएलडी प्लांट बांधला. जेएनएनयूआरएम अंतर्गत ५२ एमएलडीच्या प्लांट तपोवन परिसरात बांधला आहे. तरीदेखील या परिसरातून जमा झालेल्या सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया होत नसल्याने ते पाणी गोदावरीत सोडले जात आहे. सांडपाण्यामुळे गोदावरी नदीपात्रात सर्वत्र फेस जमला आहे. हवेमुळे हा फेस परिसरात पसरत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनादेखील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्यामुळे अनेक गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोदावरी संवर्धन कक्ष उभारण्यात आला आहे. गोदावरी नदी व परिसर स्वच्छ ठेवणे, अस्वच्छ करणाऱ्यावर कारवाई करणे इत्यादी सूचना उच्चा न्यायालयामार्फत देण्यात आल्या होत्या. मात्र तपोवनमधील मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करताच गोदावरी पात्रात सोडले जात आहे. मनपा अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे
पर्यावरणप्रेमींनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया झाल्यानंतर नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी १० ‘बीवोडी’ असणे आवश्यक आहे. परतू महापालिकेने ३० ‘बीवोडी’साठी डिझाइन केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नदीपात्रात सोडलेल्या पाण्याची तपासणी केली. त्यावेळी हे पाणी ३० बीवोडीच्या वरच आढळले. या सांडपाण्यामुळे नदीपात्रातील जीवजंतू व माशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.