डोंबिवली – डोंबिवली औद्योगिक विभाग फेज २ मधील नाल्यात रासायनिक कंपन्यांतून केमिकल मिश्रीत पाणी सोडले जात आहे.या रासायनिक पाण्यामुळे येथील नाल्याला निळा रंग आला असल्याचा आरोप मनसेचे विभाग प्रमुख संजय चव्हाण यांनी केला आहे.तर या नाल्यात केमिकल नसून परिसरातील रंगाचे पाणी असल्याचा दावा कामा संघटनेने केला आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या नाल्याच्या पाण्याची पाहणी करणार आहे.
रासायनिक कंपन्यांतून अनेकदा प्रक्रीया न करताच सांडपाणी नाल्यात सोडले जात असून यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने रहिवाशांना देखील कोणी वाली राहीला नसल्याचे नागरिक म्हणत आहेत.गेल्या एक दोन दिवसांपासून निळ्या रंगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जात आहे. सकाळ किंवा रात्रीच्या वेळेस हे पाणी कारखान्यांतून नाल्यात सोडले जात असून या पाण्याच्या उग्र दर्पाने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत.तरी यापुढे असे केमिकलयुक्त पाणी नाल्यात दिसल्यास मनसेकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेचे चव्हाण यांनी दिल.तर कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.देवेन सोनी यांनी सांगितले की, नाल्यातील पाणी हे रसायनांचे नाही.कारण कंपनीचे केमिकल नाल्यात सोडले जात नाही.कंपनीकडे तशी स्वतंत्र यंत्रणा आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची पाहणीही केली आहे.