जव्हार – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारला अलीकडेच पर्यटनाचा ब दर्जा प्राप्त झाला आहे. आता सृष्टीसौंदर्याने नटलेल्या या परिसरातील जय सागर जलाशयाच्या लगत असलेल्या खडूळ तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे.कासटवाडीचे सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातून आता या तलावाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.यामुळे येथील पर्यटनवाढीस वाव मिळणार आहे.
शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून मिळालेल्या निधीतून संरक्षण भिंती, पेव्हर ब्लॉक, पर्यटकांसाठी पार्किंग स्टॅन्ड,बसण्याचे बाकडे यासारख्या अत्याधुनिक स्वरूपाच्या सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.शहरापासून अगदी जवळच हा तलाव असल्यामुळे लोकांना मॉर्निंग वॉकसाठीही फायदा होणार आहे.जव्हार शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.या तालुक्याला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते.