वाशीम
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील नागाझरीसह इतर गावांमध्ये शनिवारी मुसळधार पावसासह गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि अचानक झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांसह शेतकऱ्यांच्या गह, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संत्रा बागायतदार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनाकडून केली जात होती.
फेब्रुवारी महिन्यात देखील वाशिमच्या अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल देखील स्थानिक यंत्रणेकडून शासनाला सादर करण्यात आला. मात्र अद्याप शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मिळाली नाही. अशातच आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि अचानक झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांसह शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.