मुंबई
मुंबईत कांद्याचे भाग गगनाला भिडले असून २० तो ३० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. राजकारण्यांना रडवल्यानंतर हाच आता कांदा सर्वसामान्यांनाही रडवत असल्याचे दिसून येत आहे. वाशीच्या बाजारसमितीमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाल्यामुळे हे दर वाढले असून पावसाळ्यात साठवलेला कांदा बाहेर काढल्यानंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.वाशीच्या बाजारात दररोज १३५ ट्रक कांदा येत असतो सध्या या बाजारात केवळ ७० ट्रक कांद्याचीच आवक होत आहे. पावसाळ्यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला असून सध्या शेतकऱ्यांच्या चाळींमधील कांद्याची विक्री सुरु आहे. हा साठवलेला कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव आटोक्यात येतील असा अंदाज बाजारात व्यक्त करण्यात येत आहे. कांद्याबरोबरच बटाटा, लसूण यांच्याही दरात वाढ झाली असून टोमॅटो ८० रुपये किलोवर गेला आहे.