कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला

ठाणे- कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज काल रात्रीच्या सुमारास ढासळला. याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र आचारसंहितेमध्ये निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिले, असे शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील यांनी सांगितले. हा निधी लवकरात लवकर मिळायला हवा जेणेकरून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणीदेखील पाटील यांनी केली. या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर असून येथे अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येतात. त्यातच अचानक हा बुरुज ढासाळल्याने हिंदु बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, स्वराज्याच्या आरमाराचे एक केंद्र म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. परंतु मागील अनेक दिवसांपासून हा किल्ला दुरवस्थेत आहे. त्यामुळे किल्ल्याची देखभाल-दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ५ वर्षांपूर्वीदेखील किल्ल्याचा बुरुज ढासाळला होता. आता या घटनेनंतर तरी किल्ल्याला पुरेसा निधी मिळून दुरुस्तीचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न शिवप्रेमी उपस्थित करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top