अमरावती
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अरुणाचल प्रदेशात काँग्रेसच्या २ आमदारांनी आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या २ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसच्या निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग या दोन आमदारांचा तर नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी राज्य, लोकसभा निवडणूक प्रभारी आणि आसाममंत्री अशोक सिंघल उपस्थित होते.
याबाबत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. मुंख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितले की, ‘काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या आमदारांचा भआजपमध्ये प्रवेश होणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलेल्या सुशासनाच्या तत्त्वांचा, विश्वासाचा पुरावा आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधानांच्या परिवर्तनवादी नेतृत्वाने देशभरात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. या पक्षप्रवेशाने आमदारांच्या मतदारसंघात सकारात्मक बदल घडून येतील. अरुणाचल प्रदेशात आमचा पाया मजबूत होईल. एकत्रितपणे, सर्वसमावेशक विकास आणि लोककेंद्रित कल्याणाच्या तत्त्वांसाठी आमची वचनबद्धता कायम ठेवण्यास उत्सुक आहोत.’
या पक्षप्रवेशानंतर विधानसभेत काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीकडे प्रत्येकी १-१ आमदार उरले आहेत. भाजपकडील आमदारांचे संख्याबळ ५६ वर पोहचले आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.