कोल्हापूर – ‘लाडकी बहीण’ सारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्यानंतर आता १००, २०० रूपयांचे स्टॅम्प पेपर म्हणजेच मुद्रांक बंद होणार आहेत.आता सर्व व्यवहार ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागणार आहेत. महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी कालपासून राज्यभरात सुरू झाली.दरम्यान,महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला आहे.
आतापर्यंत प्रतिज्ञापत्र,भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे,शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे,संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता.परंतु त्याच कामांसाठी आता लोकांना ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता, त्यासाठीही आता ५०० रुपये लागणार आहेत.पूर्वी केलेल्या करारपत्रांचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल.मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे. विविध लोकानुययी योजनांचा कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी इतर योजनांसाठी निधींची कमतरता पडल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी असे निर्णय घेत आहे.