केरळ : वाढत्या शहरीकरणामुळे तसेच अतिवृष्टीमुळे केरळ येथील एक हजार वर्षे जुन्या मंदिराची उंची कमी झाली होती. मंदिराचा परिसर वर्षभर पाण्याच्या खाली बुडाल्याने भक्तांची खूपच गैरसोय झाली. त्यामुळे मंदिराची पुरातन रचना कायम ठेवत मंदिराला आधुनिक तंत्राच्या सहाय्याने उंच उचलण्यास परवानगी देण्यात आली असून, मंदिर सहा फूट उंच उचलण्यात यश आले आहे. या अवघड कामासाठी सुमारे साडे तीन कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.
स्थापत्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत केरळातील अलप्पुझा येथील मनकोम्बू श्रीभगवती मंदिराला अतिवृष्टीत पावसाच्या पुरामुळे वाचविण्यात आले आहे. मंदिराची उंची हळूहळू कमी होत गेल्यामुळे ते सखल भागात गेले होते. २०१८ च्या अतिवृष्टीमुले तर परिस्थिती आणखीनच कठीण बनली. पाणी साचल्याने दैनंदिन पूजा पूर्ण करण्यात धोका निर्माण झाला होता. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने मंदिराची पुरातन रचना कायम ठेवत मंदिराला आधुनिक तंत्राच्या सहाय्याने उंच उचलण्यास परवानगी दिली. अखेर मंजुरी मिळाल्यानंतर समितीने कोचीस्थित अभियांत्रिकी फर्म ईडीएसएस ला हे अवघड काम सोपविले आणि एक हजार वर्षे जुने असलेल्या पुरातन मंदिराच्या ढाच्याला कोणताही धक्का न लावता स्क्रु जॅकचा वापर करीत हे मंदिर सहा फूट उंच करण्यात आले आहे. या मंदिराला त्याच्या गर्भगृहासह उचलण्यासाठी स्क्रू जॅकचा वापर करीत पृष्ठभागापासून मंदिर सुमारे १.८ मीटरवर उचलण्यात आले. मंदिराचा गर्भगृहासाठी १८ खांब आणि बीम बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक खांब २७ मीटर खोल ड्रील केला जाणार आहे. या मंदिराची उंची वाढविली असली तरी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत हे मंदिर टिकून राहणार आहे. या जागेवर इतर बांधकाम उभारण्याचाही समितीचा विचार आहे.