यवतमाळ-नाफेडने सोयाबीनची खरेदी बंद केल्यापासून सोयाबीनचे बाजारभाव गडगडले असून, ८ वर्षांतील नीचांक दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती उद्भवली आहे.
शेतकर्यांकडे सोयाबीन पडून असताना नाफेडची खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीनचे दर प्रचंड कोसळले आहेत. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सोयाबीन असून खासगी बाजारात तीन-साडेतीन हजारापेक्षा भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
२०२३-२४ च्या खरिप हंगामात सोयाबीनला प्रति क्विंटल दर ४,६०० रुपये भाव मिळाला होता, तर २०२४-२५ मध्ये ४,८९२ रुपये हमीभाव निश्चित केला गेला आहे. मात्र, नाफेडने किमान आधारभूत किमतीे सोयाबीनची खरेदी बंद केल्यावर उच्च प्रतीच्या सोयाबीनला ३,९०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटल तर सामान्य प्रतीच्या सोयाबीनला ३,५०० रुपये रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन कोठारी यांनी सांगितले की,नाफेडने मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सोयाबीनचे दर आणखी घसरले आहेत.जर सरकारने ही विक्री नियंत्रित केली असती, तर दर किमान ५०० रुपये प्रति क्विंटलने जास्त राहिले असते, असे कोठारी यांनी म्हटले आहे.
खतांच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांची किमती वाढलेली आहे, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना, सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी धोरण निश्चित करावे अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.