*’मुंबई आयआयटी’चा शोध
मुंबई- इंजेक्शन म्हटले की अनेकांची वेदना होण्याच्या भीतीने घाबरगुंडी उडते.
इंजेक्शनची सुई टोचताना अनेकजण ओरडतात, रडतात.पण आता मात्र मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे.संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली असून ती वेदनारहित आहे.
आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक वीरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘शॉक सिरींज’चा वापर करून सुई न टोचता शरीरात औषधे पोहोचविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.त्यांचा अभ्यास अहवाल ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हाइसेस’मध्ये प्रकाशित झाला आहे.या अभ्यासात त्यांनी शॉक सिरिंजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली.नियमित सुई असलेली सिरींज त्वचेला छिद्र करते तर शॉक सिरिंजमध्ये ही समस्या नसते.त्याऐवजी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या उच्च-ऊर्जा शॉक वेव्हचा वापर त्वचेला छिद्र पाडण्यासाठी केला जातो.जेव्हा या लहरी निर्माण होतात तेव्हा त्या आजूबाजूचे माध्यम जसे की हवा किंवा पाण्याला प्रेशर करतात.प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सिरिंजवर दाब लागू करून द्रव औषधाचा बारीक स्प्रे तयार करतो.या स्प्रेचा वेग विमानाच्या टेक-ऑफच्या वेगापेक्षा दुप्पट असतो.द्रव औषधाची ही फवारणी सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्वचेत जाते.ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्यापूर्वी अतिशय वेगाने घडते.