मुंबई- राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या ग्रामविकास खात्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण सहा प्रस्ताव मांडले होते. त्यात सरपंच, उपसरपंचांच्या मानधन वाढीचाही प्रस्ताव होता. इतर प्रस्तावांसोबत हा प्रस्तावही मान्य करण्यात आला.
राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहे. तर, या ग्रामपंचायतींच्या उपसरंपचांचे मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होणार आहे. २ हजार ते ८ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये होणार, तर तेथील उपसरपंचांचे मानधन १५०० रुपयांवरून ३ हजार होणार. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचे मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत तर उपसरपंचाचे मानधन २ हजारांवरून आता ४ हजारांपर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.